उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबी अंतर्गत शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसुचना विमा कंपन्यांना द्याव्यात.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.

 खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे.योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized calamities) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये राज्यातील काहीं भागात अतिवृष्टीने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

 स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक आणि बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स अंप (Crop Insurance App) संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक /बँक/कृषी आणि महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशिल कळविणे बंधनकारक असेल.

  याबाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून 72 तासा दरम्यान वैयक्तीकरित्या मोबाईल ॲपद्वारे ( Crop Insurance App), विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका/जिल्हा कार्यालयात किंवा कृषी/महसूल विभागास देणे आवश्यक आहे.याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

 
Top