उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांवर चक्री भुंगा कीडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. यावर्षी सुद्धा या कीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्रीभुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पुर्ण झाड वाळून जाते.वेळेवर उपाय योजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभुमीवर सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी उपाय योजना करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

 चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने , फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील कीडीसह नायनाट करावा.यापद्धतीचा 15 दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या कीडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्रीभुंग्याच्या कीडीने अंडी घालू नये. याकरिता सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.पीक पेरणीच्या 30-35 दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50 टक्के 30 मिली प्रती 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस. सी. 15 मिली प्रती 10 लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस.सी. 3 मिली प्रती 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 टक्के + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 6.5 टक्के झेड. सी 2.5 ग्रॅ. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

 
Top