उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांनी काल भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. भारतीय जनता पार्टी व छत्रपती राजेंची भूमिका एकच असून आम्ही त्याचे समर्थन करतो व जाहीर पाठिंबा देतो.  या संदर्भात अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकात पक्षाची आणि व्यक्तीगत भूमिका मांडली. 

छत्रपती उदयनराजे यांची मराठा आरक्षणा संदर्भात तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी अगदी रास्त आहे व यापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी देखील केली आहे. 

छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या ५ मागण्यांबाबत आर्थिक तरतुदी सह कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, ही अपेक्षा आहे. सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांना योग्य आर्थिक तरतुद, गरीब मराठा समाजाला ओ.बी.सी.च्या प्रमाणे सवलती देणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह,  २१८५ निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी; या संदर्भातील मागण्या समाजासाठी अत्यंत गरजेच्या असून या मागणीला १५ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटून देखील अतिशय संवेदनशील असलेल्या या विषयावर काहीही कार्यवाही होत नाही. 

या सर्व मागण्या संपूर्णतः राज्य सरकारच्या अखत्यारीत असून फडणवीस सरकारने या बाबी कृतीत आणल्या होत्या. आत्ताचे ‘लोकशाहीतील राजे’ यावर कार्यवाही का करत नाहीत ? हा प्रशन पुढे येतो. याचा अर्थ कुठली तरी मोठी शक्ती हे होऊ देत नाही असाच होतो. त्यामुळे राज्य सरकार मधील झारीतील शुक्राचार्य नेमके कोण - कोण आहेत, याचा शोध घ्यावा लागणार आहे.

राज्य सरकारने ३४२(अ) प्रमाणे परिपूर्ण अहवाल महामहिम राज्यपाल महोदयांकडे पाठविणे आवश्यक आहे. राज्य सरकारने त्यांच्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण केल्यानंतर केंद्राचा विषय येतो. राज्याने अगोदर विशेष अधिवेशन बोलवावे व त्यांच्या अखत्यारीतील कार्यवाही पूर्ण करावी, त्यानंतर केंद्रा कडील कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी व छत्रपती उदयनराजे बोलल्या प्रमाणे आमची सर्वांची आहे, ती आम्ही तत्परतेने पार पाडू. 

 
Top