उस्मानाबाद / प्रतिनिधी-

युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा.ना.आदीत्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोरोनामुळे अनाथ झालेल्या अठरा वर्षाखालील बालकांचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला. अशा बालकांना तातडीने प्रत्येकी एक लाख रुपयाची आर्थिक मदत केली असुन पाल्यांच्या नावे ही मुदतठेव ठेवण्यात येणार आहे. 

आज आदीत्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक स्वरुपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, शिवसेना गटनेते तथा नगसेवक सोमनाथ गुरव, शहरप्रमुख संजय (पप्पू) मुंडे, शामराव शिंदे आदींच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्र देऊन आज सुरवात केली.

कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबाची हानी झाली आहे, कोणाचे आई तर कोणाचे वडील यामध्ये बळी पडले आहेत. अशा कुटुंबाची झालेली हानी कधीही भरुन येऊ शकत नाहीच. पण त्यातही ज्या पाल्याचे आई-वडील दोघेही मयत झाल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत त्याने समाजमन हादरुन गेले आहे, अशावेळी त्यांची मुल उघड्यावर पडण्याची भिती होती. शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन जबाबदारी स्विकारण्याचे महत्वाचे काम केले आहे. 

शिवसेनेचे ब्रिद 80 टक्के समाजकारणाचे आहे, त्यामुळे पक्षांच्यावतीनेही त्यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेने ही जबाबदारी घेत या मुलांचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. युवासेनेचे प्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त या प्रत्येक कुटुंबाना एक लाख रु.मुदत ठेव पाल्यांच्या नावे केली आहे. ही रक्कम त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी ठरावी म्हणुन मुदतठेव स्वरुपात ठेवण्यात आली आहे. पुढील काळात त्यांच्यासोबत राहुन त्याना आधार देण्यासाठी शिवसेना त्यांच्यासोबत कायमस्वरुपी राहणार आहे.

आई-वडीलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली ही मोठी पोकळी भरुन काढण्यासाठीचा शिवसेनाचा छोटासा प्रयत्न आहे. त्यांना या काळात साथ देणे हे समाज म्हणुन आपले कर्तव्य आहे, ही सामाजिक जाणीव ठेऊन शिवसेना या कुटुंबासोबत आहे,.समाजातील उपेक्षित घटाकासाठी शिवसेना नेहमीच पुढाकार घेत असते, हा काळ तर आणीबाणीचा आहे. अडचणीच्या काळात शिवसेना कधीच मागे हटत नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणुन जबाबदारी पेलतच आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणेच हा निर्णय घेत या पाल्यांचे पालकत्व शिवसेना स्विकारत असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

 
Top