उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आपल्या डोळ्याची काळजी आपणच घ्यायला हवी. मुधमेह आजार असणाऱ्या आणि कोरोना होऊन गेलेल्या रूग्णांनी म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी,यामुळे उपचार करणे सोयीचे होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी सांगितले.

 डॉ.राम लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 10 ते 16 जून 2021 या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दृष्टीदान दिन सप्ताहाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख, डॉ ईस्माईल मुल्ला, नेत्र शल्यचिकित्सक डॉ.एम.के.पल्ला, डॉ.महेश पाटील, डॉ.विरभद्र कोटलवाड, डॉ. ज्योती कानडे,डॉ.एन.बी.गोसावी,डॉ.सुधीर सोनटक्के, डॉ.प्रविण डुमणे,डॉ.संजय सोनटक्के,डॉ.सचिन गायकवाड, अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे,शेख अयुब,श्रीमती रेणुका भावसार,नेत्रविभागाचे वॉर्ड इन्चार्ज शेख रौफ, नेत्रविभागातील अधिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

  डॉ.पाटील म्हणाले, सहा महिण्यातून एकदा डोळ्याची तपासणी करुन घ्यावी. रक्तदाबाप्रमाणे डोळ्यातील दाबाचे प्रमाण तपासून घ्यावे. कोरोना होऊन गेलेल्या रूग्णांनी डोळ्याची काळजी घ्यावी.

  प्रास्ताविकात नेत्र शल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील म्हणाले,डॉ.भालचंद्र यांनी सामाजिक भावनेतून आणि कोणतीही सुविधा नसताना अंधत्व निर्मुलनाचे कार्य करुन हजारो लोकांना दृष्टी दिली.मरणोत्तर नेत्रदानाबाबत माहिती देऊन सर्वांना नेत्रदानाचे संमती पत्र भरुन देण्याबाबत आवाहन केले.

  यावेळी अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड इन्चार्ज, अधिपरिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अयुब शेख यांनी केले तर आभार डॉ. देशमुख  यांनी मानले.


 
Top