उस्मानाबाद / प्रतिनिधी

आपल्या आजुबाजूला रोजगाराच्या अनेक संधी आहेत, तशी आव्हानेही अनेक आहेत. यावर मात करून कोणताही व्यवसाय निवडला तरी तो करत असताना त्यामध्ये नाविन्याचा शोध घेऊन तो सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केल्यास यशाच्या शिखरावर पोहचता येते, असे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी केले.

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रविवारी दि, 14 रोजी नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये हणमंतराव गायकवाड यांचे रोजगाराच्या संधी व आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सिद्धीविनायक ग्रुपचे अध्यक्ष दत्ता कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय मंत्री, ओमजय ट्रेडींग कंपनीचे प्रमुख नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, जयतुळजाभवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय पाटील, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, व्यापारी मंजळाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव, डॉ. रणजीत कदम, डॉ. दिपिका सस्ते, गटशिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. गायकवाड म्हणाले, की बीव्हीजी ग्रुपचे काम अवघ्या आठ लोकांनी मिळून सुरू केले होते. आज या ग्रुपमध्ये 80 हजार  लोक काम करीत आहेत. संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय, देशातील महत्वाची विमानतळे आदी ठिकाणी  कंपनीचे काम सुरू आहे. कंपनीचे कार्य राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे. कंपनी मनुष्यबळ पुरवठा करीत असतानाच बांधकाम, शेती, आयुर्वेदिक औषधे निर्मिती, पशुखाद्य, पशुऔषधे, सेंद्रिय खते, औषधे निर्मिती क्षेत्रात काम करीत आहे. भविष्यात येत्या 10 वर्षात 10 कोटी लोकांना रोजगार देण्याचा संकल्प असून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा निर्धार केला आहे. देशात बेरोजगारी ही मोठी समस्या बनत चालली आहे. कोठेही काम करत असताना आपली स्वतःची कंपनी समजून काम करण्याची गरज आहे. असे केले तरच कंपनीचा पर्यायाने कामगारांचा फायदा होत असतो. यापुढे शेतकर्‍यांसाठी काम करण्याचा निश्चय केला आहे. सध्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून दुप्पट उत्पादन मिळण्यासाठी कंपनीचे काम सुरू आहे. बटाटा, द्राक्षे, कापूस, हळद, सोयाबीन या पिकामध्ये काम सुरू असून अपेक्षित रिझल्ट मिळाला आहे. सध्या एक लाख शेतकरी बीव्हीजी चळवळीशी जोडले गेले आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील 10 हजार शेतकरी कंपनीशी जोडले असून उस्मानाबाद जिल्ह्यातही उत्पादन वाढीसाठी काम करणार असल्याचे आश्वासन श्री. गायकवाड यांनी दिले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. आशिष मोदाणी यांनी प्रास्ताविक केले. दत्ता कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण झाले. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

 
Top