उस्मानाबाद/ प्रतिनिधी
इंधनाचे वाढविलेले दर कमी करावेत व वीज बिल माफ करावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. ९ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोनाच्या कठिण काळातील दुप्पट-तिप्पट भरमसाठ दिलेली वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत व वाढविलेले इंधनांचे दर तात्काळ कमी करण्यात यावे, संकटामुळे राज्यातील मध्यमवर्गीय व्यापारी, कामगार, शेतकरी यांच्यासह सर्वांना अतोनात त्रास झाला आहे. उद्योग, व्यापार बंद झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच वीज कंपनीने राज्यातील जनतेला वाढीव वीज बिल दिले आहे. वीज मंत्री नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता थकित बिल न भरल्यास विज तोडणी करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच शासनाने पेट्रोल-डिझेल गॅसचे दर भरमसाठ वाढविलेले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे वाढलेले इंधनाचे दर कमी करावेत व वीज बिल माफ करावे अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, अतुल गायकवाड, जिल्हा सचिव आशिष पाटील, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कवडे , शहराध्यक्ष आदित्य देशमुख, तालुका अध्यक्ष संदीप लाकाळ, जिल्हा उपाध्यक्ष मनोज लोमटे पाटील, आकाश मुंडे, शिवदास पवार, बालाजी नाईकनवरे, कृष्णा जगताप, अमोल खवले, हनुमान हुंबे, दिनेश चौगुले, सुशांत नाळपे, सुनील आडमुटे, सय्यद शहानवाज, रईस शेख, अमर घोडके व गोकुळ डोके यांच्या स्वाक्षरी आहेत.