उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये आज (30 जानेवारीला) हुतात्मा दिन साजरा करणे अनिवार्य असताना, हा दिन साजरा न केल्याने नगरपालिकेला या दिनाचे वावडे आहे काय ? असा प्रश्न उस्मानाबाद शहरातील नागरिक करीत आहे. या संदर्भात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सेव्ह फार्मस विडोज फाऊंडेशन च्या अध्यक्ष सौ शीलाताई उंबरे पेंडारकर उस्मानाबाद यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

राज्य शासनाच्या  अध्यादेशानुसार  शासकीय कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थोर, क्रांतिकारक,विचारवंत व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरा करण्यात याव्यात तसे आदेश आहेत. मात्र उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये 14 एप्रिल अर्थात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शिवाय एकही जयंतीचा कार्यक्रम घेतला जात नाही.

नगरपालिकेने  शासनाने ठरवून दिलेल्या जयंती,पुण्यतिथीचे कार्यक्रम  वेळच्या वेळी घेणे अपेक्षित आहे मात्र नगराध्यक्ष देखील अशा कार्यक्रमाकडे पाठ फिरवतात हे दिसून येते. पालिकेचे मुख्याधिकारी, कार्यालय अधीक्षक कार्यक्रमाकडे साफ दुर्लक्ष करतात. सत्य, अहिंसा, विश्वबंधुता अशा उच्च मानवी मूल्यांचा आजीवन पुरस्कार करणारे राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांचे विचार आजही समाजासाठी तितकेच अनुकरणीय आहेत.त्यांची पुण्यतिथी हुतात्मा  दिन म्हणून शासनाकडून साजरी केली जाते.

गेल्या अनेक वर्षापासून उस्मानाबाद नगरपालिका शासकीय अध्यादेशाचे उघड उघड उल्लंघन करताना दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी व संबंधित दोषी असणाऱ्या व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई करावी अन्यथा याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सेव्ह फार्मस विडोज फाऊंडेशन च्या अध्यक्ष सौ शीलाताई उंबरे पेंडारकर,ज्योति सपाटे इत्यादी महिला यांनी जिल्हाधिकारी यांना  निवेदनात दिला आहे.

 
Top