उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शेेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा चेतना अभियान सुरू केले होते. मराठवाडा आणि विदर्भातील शेेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व सामान्य शेेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तयार केलेली ही योजना राज्य शासनाने बंद करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून, ही योजना बंद करू नये, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली.
काळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्वाधिक आत्महत्याग्रस्त शेेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यातील शेेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला. बळीराजा चेतना योजनेच्या माध्यमातून शेेतकऱ्यांना मदत करणे, शेतकरी कुटुंबातील मुलामुलींसाठी सामुहिक विवाह सोहळे, आरोग्याच्या सेवा पुरवणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन करून देणे आदी कार्यक्रमाचा यामध्ये समावेश होता. गेल्या ३ ते ४ वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील शेेतकऱ्यांना बळीराजा चेतना अभियानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. शेेतकऱ्यांच्या दृष्टीने ही योजना फायदेशीर व मदतीची आहे, असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु झारीतील शुक्राचार्यांमुळे बळीराजा चेतना अभियान योजनेच्या अंमलबजावणीत व कार्यवाहीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र झालो व शेतकऱ्यांचे एकमेव तारणहार असल्याचा भास सतत निर्माण करणारे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने तत्काळ अंमलबजावणीसही बळीराजा चेतना अभियान योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण घटलेले नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या बळीराजाची योजना बंद करणाऱ्या निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व शेेतकऱ्यांच्या वतीने करीत आहोत.
x

 
Top