उस्मानाबाद / प्रतिनिधी
 राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना विविध ठिकाणी होणारे लग्नसोहळे हे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरत आहेत. उस्मानाबादमध्येही अशीच एक घटना घडली असून वधू पित्यासह लग्नाला उपस्थित असणाऱ्या तब्बल 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या एकूण 200 जणांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देणे हे चांगलं काम मानले जाते. पण विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणे हे 200 जणांना महागात पडले आहे. या विवाह सोहळ्यात उपस्थिती लावणाऱ्या पैकी 24 जण हे कोरोनाबाधित झाले आहेत.
भूम तालुक्यातील राळेसांगवी गावात 29 जूनला एका वधू पित्याने विवाह सोहळा आयोजित केला होता. पण ज्या वधू पित्याने हा सोहळा आयोजित केला होता तोच कोरोना बाधित निघाला आणि वऱ्हाडी मंडळी यांच्यासह आयोजकात एकच खळबळ उडाली. या वधू पित्याच्या संपर्कात आलेल्या 24 जणांचा आतापर्यंत अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला असून आणखी 15 ते 17 जणांचा अहवाल येणे प्रलंबित आहे.
पोलिसांनी आता आयोजक व वधू पित्यासह 200 जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करताना पोलिसांची देखील चांगलीच धावपळ उडत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली होती. जुन्नर तालुक्यातील एका लग्नसोहळ्यात मुंबईचा एक कोरोना पॉझिटिव्ह पाहुणा उपस्थित राहिला आणि त्याने विवाह सोहळ्यातील नवरा-नवरीसह अनेकांना बाधित केले. या कार्यक्रमाला जवळपास 400 जण उपस्थित होते.
लग्नानंतर रात्री वरात झाली. त्यात सुद्धा मोठी गर्दी होती. नवरा-नवरी कोरोनाबाधित असल्याचे काल आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. येथील लग्न सोहळ्यासाठी आलेला पाहुणे,कार्यमालक,वऱ्हाडी आणि पाठोपाठ नवरा नवरी कोरोनाबाधित निघल्याने हा विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला.
 
Top