उस्मानाबाद/प्रतिनिधी- 
लॉकडाऊन मधील तीन महिन्याची 300 युनिटपर्यंत घरगुती वीज बिले राज्यसरकारने भरण्याच्या  मागणीसाठी या वाढीव बिलांची राज्यभर 13 जुलै रोजी तहसील, महावितरण कंपनी ,उपविभागिय अधिकारी ,जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर होळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली आहे.
 जगभरात चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना विषाणूमुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे .जगभरातील काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत .सदर विषाणूचा भारतातही शिरकाव झालेला आहे .त्यामुळे दि 22 मार्च 2020पासून देशांत तसेच राज्यात लाॅकडाऊन जाहीर झाले .अजूनही लाॅक डाऊन आहे, जिथे लाॅक डाऊन मध्ये सूट दिलेली आहे ,तेथे अजून उद्योग धंदे चालू नाहीत. आजही लोकांच्या  हाताला काम नाही अशी परिस्थिती आहे .आज गरीब, मध्यम वर्ग यांना रोजचे जीवन जगायला पैसे नाहीत. ते महावितरण कंपनीने पाठविलेली तीन महिन्यांची वीज बिले कशी भरणार? लाॅकडाऊन मुळे महावितरण कंपनीला वीज ग्राहकांचे मिटर रिडींग घेतली नाही ही वस्तुस्थिती असली तरी जून महिन्यात लाॅकडाऊन मध्ये सूट मिळताच महावितरण कंपनीने एकदम मार्च ते मे 2020 असे एकत्रित मिटर रिडींग घेऊन त्याप्रमाणे वीज ग्राहकांना बिले दिलेले आहेत .त्यातच एप्रिल 2020 पासून वीज दरांमध्ये प्रचंड दरवाढ करण्यात आली आहे. आधीच कोरोना विषाणूमुळे हैराण झालेले नागरिक महावितरणच्या एकदम तीन महिन्याच्या आलेल्या वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झाले आहेत .त्यामुळे ग्राहकांच्या असंतोष आहे .या महामारी मुळे अनेक नागरिकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे .अनेक लोक आर्थिक अडचणीत आलेले आहेत .अनेकांचा रोजगार, उद्योग व व्यवसाय बुडालेला आहे. केंद्र व राज्य शासनाने सर्व लोकांना घरातून बाहेर पडू नये असे सांगितले. त्यामुळे सर्वच लोकांना घरातून बाहेर पडता आले नाही हा त्यांचा दोष नाही. लॉकडाऊन मुळे कोणाच्या हाताला काम मिळालेले नाही .त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर लॉकडाऊन मुळे देशात आर्थिक आणीबाणी सारखी परिस्थिती आहे .अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत .त्यामुळे लोकांच्या हाताचा रोजगार बुडाला आहे .त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा वेळी कुटुंब प्रमुख  म्हणून राज्य शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांची घरगुती वीज बिले 300 युनिटपर्यंत राज्य शासनाने भरावे अशी जनता दल सेक्युलर पक्षाने  शासनाकडे मागणी आहे.  या मागणीसाठी घरगुती वीज ग्राहकांच्या तसेच जनता दलाच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय. तहसीलदार किंवा महावितरणचे कार्यालय यांच्या दारात वाढीव वीज बिलांची होळी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती  अॅड भोसले यांनी दिली.
 
Top