उमरगा /प्रतिनिधी-
तालुक्यातील कुन्हाळी गावासह परिसरातील अनेक गावात शुक्रवारी (०८) दुपारी साडेचार च्यासुमारास झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे तब्बल ४० घरावरील पत्रे उडून अन्नधान्याचे नुकसान झाले तर गावातील २० झाडे उमळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान शिवाराती पन्नास पानमळ्यांचे नुकसान झाले असून आमराईत आंब्याचा रानावर सडा पडला होता.
कोरोना पार्श्वभूमीवर अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे कुन्हाळी गावासह शिवारातील अनेक भागातील घरावरील पत्रे, पत्र्याचे शेड उडाल्याने अर्धा तास झालेल्या पावसात घरात ठेवलेल्या अन्नधान्याचे पावसात भिजून नुकसान झाले आहे. प्रताप सांगवे, बाबा बेरड, सुमनबाई कुंभार, मारुती जाधव, संदीपान झाकडे, कोंडाबाई कांबळे, कौशल्या झाकडे यांच्यासह ४० घरावरील पत्रे उडाल्याने पावसात अन्नधान्याचे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमनबाई कुंभार यांचे पत्र्याच्या शेडवर झाड उमळून पडल्याने घराचे नुकसान झाले तर गावातील जवळपास २० झाडे वाऱ्याने विद्युत तारावर कोलमडल्याने विज पुरवठा खंडित झाला होता. शिवरामपंत चालुक्य विद्यालया च्या तीन खोल्यावरील पत्रे उडून मैदानावर पडले होते.
 पानमळ्यांचे व आमराईचे नुकसान 
कुन्हाळी शिवारात सायंकाळी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे जवळपास ५० पानमळ्या तील वेलाना आधार दिलेल्या शेवग्याची हजारो झाडे उमळून पडल्याने पानांची वेले रानावर पडून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शिवारातील आमराई तील अनेक आंब्याच्या झाडावरील आंब्याचा रानावर सर्वत्र सडा पडला होता. दरम्यान सरपंच विठ्ठल अंबुलगे, उपसरपंच भैरू लेंडवे, कृषी सहाय्यक सचिन कांबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी सायंकाळी जावून पाहणी केली असून पानमळ्यांची शनिवारी (०९) सकाळी नुकसानीचे पंचनामे होणार असल्याची अधिकृत माहिती असून दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. शुक्रवारी वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनाहि मोठा फटका बसला असून पानमळे व आंब्याच्या झाडाचे मोठे नुकसान झाले.

 
Top