प्रतिनिधी /उस्मानाबाद-
निवडणुकीमध्ये शिवसैनिकांच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादावर भगवे सरकार स्थापन झाले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या प्रेरणेतून सगळ्यांनी कामे करावीत. आपण आता सत्तेत आलो असून संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक आपली जनता जनार्धन आहे. त्यामुळे आपल्या माणसांबरोबरच विरोधकांचीही कामे करा, त्यांनाही आपलेसे करा. बेरोजगारमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त हरित महाराष्ट्र करण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी उस्मानाबादेत केले.
युवा सेनेच्या जनआशीर्वाद यात्रेअंतर्गत उस्मानाबादेत बुधवारी (दि.३१) आयोजित विजय संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करताना आदीत्य ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मी ज्या भागात फिरतोय तेथे पाऊस हजेरी लावतोय. आज उस्मानाबादेतही तसे घडले यामुळे माझा पायगून चांगला आहे असे काहीजण म्हणत आहेत. परंतु, असे जर असेल तर संपूर्ण महाराष्ट्र पायी फिरून दुष्काळ संपवेल असे सांगत लोकसभेमध्ये जनादेश दिला त्याचे आभार मानायला मी आलो आहे, आज सर्वांचे आशीर्वाद मी घेत असलो तरी याचे खरे हक्कदार समोर असलेले सर्व शिवसैनिक आहेत. या माध्यमातून राज्याच्या तळागाळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतोय असे सांगितले. यावेळी सर्वप्रथम आदीत्य ठाकरे यांच्यासह व्यासपीठावरील पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, माजीमंत्री सचिन आहीर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा कवड्याची माळ, तुळजाभवानी देवीचा फोटो व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यत आले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, शिवाजी कापसे, संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर, सतिश सोमाणी, केशव पाटील, श्यामलताई वडणेंसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन पालिकेतील गटनेता सोमनाथ गुरव यांनी केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top