![](https://2.bp.blogspot.com/-IEioLL98xK4/XKrlo3y2eZI/AAAAAAAAAOw/BWxVH70OJvIqVQIlpUU2gG4veer_pB4lgCLcBGAs/s200/1%2Bosmanabad.jpg)
प्रतिनिधी/ नळदुर्ग
दुष्काळात होरपळणाऱ्या पशुधनासाठी शासकीय मदत न घेता समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील 'रामतीर्थ' येथे गोवंश चारा छावणी सुरू करण्यात आली. एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब हंगरगेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
परिसरातील गरजू शेतकऱ्यांच्या गोवंशासाठी छावणी सुरू केली. दुष्काळात पशुधनाला चारा, पाणी मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांसमोर पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न आहे. रविवारी (दि.७) शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी छावणीत ४८ पशुधन दाखल झाले. गरजू शेतकऱ्यांनी ९९२१८२८४४८ या क्रमांकावर संपर्क करून गोवंश पशुधन दाखल करावेत असे आवाहन संस्थेने केले आहे. जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने मुक्या जनावरांची उपासमार होत आहे. याप्रसंगी महाराष्ट्र पोलिस प्राधिकरणचे सदस्य उमाकांत मिटकर, डॉ. किरण पवार,रामतीर्थ देवस्थानचे पदाधिकारी बलभीम मुळे, मुख्याध्यापक सुरेश नकाते, रास्व.संघाचे तालुका संघचालक बळीराम काळे, विहिपचे संगमेश्वर पाटील, नगरसेवक नितीन कासार, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, आनंद जाधव, लक्ष्मण दुपारगुडे, किशोर सूरवसे, व्यंकट महाबोले, प्रणिता शेटकार, सुचिता हंगरगेकर, राधा मिटकर, प्रा.डॉ. जयश्री घोडके, उपप्राचार्य एस. एस. शिंदे, पांडुरंग पवार, डॉ. अंबादास कुलकर्णी, उमेश नाईक, विकास जगदाळे यांच्या हस्ते गो-पूजन करून छावणीची सुरूवात झाली.