धाराशिव (प्रतिनिधी) - यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. मात्र, पावसाने 10-15 दिवस नव्हे तर चक्क सलग दोन महिने दडी मारलेली आहे. त्यामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील उभी पिके जाग्यावरच करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून पावसाअभावी शेतातील पिके अक्षरशः करपत असतानाच तलावांमधून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी देखील बंद करण्यात आल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर व चिंताजनक बनली आहे. त्यामुळे अस्मानी व सुलतानी असे दुहेरी संकट या भागातील शेतकऱ्यावर कोसळले आहे. या भागातील शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना आधार व धीर देण्यासाठी शासनाने उमरगा व लोहारा तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते आनंद (तात्या) पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पाटील हे पहिल्यापासूनच दोन्ही तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासह विविध प्रकारच्या विकास कामांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
.शिवसेना नेते आनंद (तात्या) पाटील यांनी मंत्रालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन उमरगा व लोहारा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. पावसाअभावी पिकांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट आ वासून उभे राहिले आहे. त्यातच भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आगामी काळात तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली. विशेष म्हणजे पाटील यांच्या मागणीची पालकमंत्री सरनाईक यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, जिल्हाधिकारी यांना उमरगा व लोहारा तालुक्यातील पावसाची स्थिती, पीक परिस्थिती, पाणी टंचाई आणि नुकसानीसह संपूर्ण माहितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मागणीला आता प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळैल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
दरम्यान, उमरगा व लोहारा तालुक्याच्या विकासासाठीही पाटील यांनी पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये दोन्ही तालुक्यातील रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि नागरिक यांच्या विविध प्रलंबित प्रश्न सांगत त्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून घेत ही कामे तातडीने मार्गी लावावीत अशी आग्रही मागणी केली.
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसह दोन्ही तालुक्यातील विकास कामांसाठी पाटील यांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तर आता दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या मागणीची पालकमंत्री सरनाईक यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आनंद पाटील यांच्या समवेत महादेव जानकर, पंचायत समिती उपसभापती अमोल पाटील, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, मार्डीचे सरपंच श्रीमंत पाटील, नितीन कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.