धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून, सोयाबीनसह विविध पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे रविवार, दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली.

या दौऱ्यात आ. रोहित पवार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून पावसाची स्थिती, पिकांचे झालेले नुकसान, पाण्याची उपलब्धता, चारा-पाण्याची समस्या तसेच पीकविमा आणि शासकीय मदतीबाबतच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत.यापूर्वीही आ. रोहित पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, सोयाबीनचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आ. रोहित पवार दौऱ्यानंतर कोणती भूमिका मांडतात, याकडेही लक्ष लागले आहे.

रविवार, दि. 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या दुष्काळी दौऱ्यातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रत्यक्ष शेतीस्थिती शासनाच्या पातळीवर मांडण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.


 
Top