मुरुम (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास केवळ हैदराबाद मुक्तीच्या अंतिम घटनेपुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागातील सामान्य जनतेने केलेल्या संघर्षातून हा इतिहास घडला आहे. या स्थानिक योगदानाची नोंद आणि अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच 78 वर्षां पुर्वी दिलेल्या या लढ्यानंतर मराठवाडा जनतेला स्वातंत्र्य मिळाले. पण जवळ जवळ साडेसात दशकांनंतर आज आपण शेती, उद्योग या क्षेत्रात क्रांती केली का? आर्थिक आणि सामाजिक,  शैक्षणिक मागासलेपण दूर झाले का? यावर विचारमंथन आणि अभ्यास व संशोधन करण्यासाठी प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यानी पुढाकार घेणे हेच हुतात्म्यांना खरे अभिवादन आहे असे मत डॉ. प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी व्यक्त केले. 

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमवंशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर डॉ. सोमवंशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात उमरगा तालुक्यातील, गुंजोटी, नाईचाकुर आणि  उमरगा परिसरातील जनतेने पुढे येऊन धैर्याने सहभाग घेतला. रझाकारांच्या अत्याचाराला विरोध करत स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला संघर्ष हा मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे, उमरगा व गुंजोटी परिसराचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान सविस्तरपणे मांडले. निजामाच्या राजवटीत रझाकारांकडून होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध स्थानिक पातळीवर झालेले प्रतिकार  यावर सविस्तर मार्गदर्शन महाविद्यालयाचे इतिहास अभ्यासक डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले.  देवीसिंग चौहान आणि तात्याराव मोरे यांनी रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध उभे राहून केलेल्या संघर्षाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाईचाकूर येथील पोलिस चौकी लुटण्याच्या घटनेची दखल हैदराबादपर्यंत घेतली गेली होती. स्थानिक पातळीवरील अशा धाडसी घटनांमधून मराठवाडा मुक्ती संग्रामाची व्यापकता आणि जनतेचा संघर्ष स्पष्ट होतो, असे डॉ. सोमवंशी यांनी नमूद केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, प्रा. शैलेश महामुनी, प्रभारी प्राध्यापक डॉ. सुभाष इंगळे, प्रा. दत्तात्रय लोभे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद देवरकर यांनी केले तर उपप्राचार्य प्रा. जी. एस. मोरे यांनी आभार मानले.

 
Top