कळंब (प्रतिनिधी)- माणूस आयुष्यभर सुख, समाधान आणि आनंदाच्या शोधात धावत असतो; मात्र पैसा, संपत्ती आणि भौतिक सुखसुविधा मिळूनही त्याला खरे समाधान लाभत नाही. जीवनातील खरा आनंद आणि मनःशांती मिळवायची असेल, तर भागवत कथा ऐकलीच पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. अँड धर्माचार्य .शंकर महाराज शेवाळे यांनी केले.
कळंब येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित भागवत कथेदरम्यान ते भाविकांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या रसाळ आणि ओघवत्या शैलीतील निरूपणाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ह.भ.प.अँड धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे म्हणाले, “माणूस आयुष्यात वेगवेगळ्या रूपात प्रेम करतो. लहानपणी आईवर प्रेम करतो, पुढे पत्नीवर, त्यानंतर मुलाबाळांवर आणि शेवटी पैशावर प्रेम करू लागतो. मात्र या सगळ्यातून त्याला अपेक्षित असलेले समाधान मिळत नाही. मनाचे समाधान आणि जीवनाचा खरा आनंद मिळवायचा असेल, तर भगवंताच्या चरणी मन रमवून भागवत कथा श्रवण करणे आवश्यक आहे.”
भागवत कथा ही केवळ धार्मिक कथा नसून मानवी जीवनाला दिशा देणारी, मनाला शांती देणारी आणि जगण्याचा खरा अर्थ समजावून सांगणारी जीवनदृष्टी आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महाराजांच्या रसाळ वाणीतील निरूपणाने वातावरण भक्तिमय झाले होते. भागवत कथा श्रवणासाठी महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ह.भ.प.अँड धर्माचार्य .शंकर महाराज शेवाळे यांच्या वाणीतुन हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
