धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत 1 ऑगस्टपासून एसटी प्रवासातील विविध शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना पुरेसा वेळ मिळावा. यासाठी रुपामाता फाऊंडेशनचे सचिव तथा विश्व हिंदू परिषद, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड अजित गुंड पाटील यांनी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयाकडे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाचा डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम स्वागतार्ह असला तरी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना अद्याप कार्ड काढता आलेले नाही. नोंदणी केंद्रांची मर्यादित उपलब्धता, तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव आणि वाढती गर्दी यामुळे अनेक पात्र लाभार्थी कार्ड मिळविण्यापासून वंचित आहेत.
विशेषतः महिलांना मिळणारी 50 टक्के प्रवास सवलत, तसेच ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींचा लाभ कोणत्याही पात्र नागरिकापासून वंचित राहू नये. यासाठी कार्ड आवश्यकतेच्या अंमलबजावणीस किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, प्रत्येक तालुक्यात विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करावीत, ग्रामीण भागात कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मुदतवाढीच्या कालावधीत विद्यमान पद्धतीने प्रवास सवलती सुरू ठेवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.