परंडा (प्रतिनिधी)- कल्याणसागर समुहातील परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उत्कर्ष गजानन कोठावळे याने नीट आणि जेईई या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही अत्यंत कठीण असलेल्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल उत्कर्षचा आणि त्याच्या आईचा कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्कर्ष कोठावळे याने नीट परीक्षेत 720 पैकी 656 गुण मिळवून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था या नामांकित संस्थेत वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग सुकर केला आहे. तर जेईई संयुक्त परीक्षेत 99.40 पर्सेंटाईल गुण घेऊन या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत भरघोस गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून मोठे यश मिळवले आहे. उत्कर्षचा वैद्यकीय प्रवेश परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर 1091 तर आर्थिक दुर्बल घटकात 80 रँक आहे.
उत्कर्ष कोठावळे याचे लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याची आई श्रीमती अश्विनी गजानन कोठावळे यांनी अत्यंत कठीण व प्रतिकूल परिस्थितीत अपार कष्ट घेऊन सातत्याने उत्कर्षच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. कल्याणसागर समूहाच्या शाळांतील उत्कर्ष कोठावळे हा लहानपणापासूनच विविध स्पर्धांमध्ये भाग घेणारा अभ्यासू व हुशार विद्यार्थी होता. त्याने कल्याणसागर समुहामार्फत घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत इयत्ता चौथीत असतानाच इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातून परीक्षा देऊन प्रथम क्रमांक मिळवून आपली कुशाग्र बुद्धिमत्ता दाखवून दिली होती. तर कल्याणसागर विद्यालयातून दहावी बोर्डाच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता.
उत्कर्ष कोठावळे हा शिक्षणात हुशार तर आहेच परंतु तो वक्तृत्व, गायन, वादन या कलांतही निपुण असून त्याने राज्स्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही यश मिळविलेले आहे. उत्कर्षच्या उत्तुंग यशाबद्दल त्याचे आणि त्याच्या आईचे कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. यावेळी उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, रामचंद्र कुलकर्णी, कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, शिक्षक महादेव नरूटे, अजित गव्हाणे, मुकुंद भोसले, अंगद लांडगे तसेच अरविंद रगडे, उमाकांत गोरे, सुखदेव टोंपे, धनंजय काळे, सिद्दीक हन्नूरे, सोहम परदेशी तसेच कोठावळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
