ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांची मागणी


( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी)

धाराशिव तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा, अशी मागणी रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण,विभागीय कार्यालय धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ढोकी येथे महावितरणची दोन ३३ केव्ही सब-स्टेशन्स असून त्यावर अनेक गावांचा वीजभार अवलंबून आहे. मात्र, दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी व लघुउद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीपंप, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, उद्योगधंदे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांवर याचा विपरीत परिणाम होत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ढोकी परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिर होण्यास मदत होईल. त्यामुळे संबंधित प्रकल्प तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी महावितरणकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून सब-स्टेशन, वीजवाहिन्या, रोहित्रे, झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच इतर आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, जेणेकरून पावसाळ्यात वारंवार होणारे वीज खंडितीचे प्रकार टाळता येतील, असे अँड. अजित गुंड पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

जनहिताचा विषय लक्षात घेऊन ढोकी व परिसरातील नागरिकांना अखंडित, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी रुपामाता फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य, अधीक्षक अभियंता महावितरण धाराशिव तसेच कार्यकारी अभियंता महावितरण धाराशिव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
 
Top