धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपले वाद सामोपचाराने निकाली काढावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीत मोटार वाहन अपघात प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे,दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणांचा समावेश करण्यात येणार आहे.तसेच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणेही लोकअदालतीत घेण्यात येणार आहेत. याशिवाय कौटुंबिक न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे देखील या लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटविल्यास संबंधित पक्षकारास भरलेली न्यायालयीन फी परत मिळण्याची तरतूद आहे.

नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ,पैसा आणि मानसिक ताण-तणाव वाचवावा,तसेच राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अभिश्री देव व सचिव श्रीमती भाग्यश्री  पाटील यांनी केले आहे. आपली प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यास इच्छुक नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी 8591903625 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsaosd25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.तसेच प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशीही संपर्क साधावा.

 
Top