धाराशिव (प्रतिनिधी)- जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे,शोषखड्डे व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत हर घर जल योजना,जल सेवा अभियान आणि जल जीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि.17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा महाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस.कटकधोंड,कनिष्ठ भूवैज्ञानिक एम.आर.डोंगरे आदी उपस्थित होते.
बैठकीत जल जीवन मिशनअंतर्गत उद्भव विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,जलताराची कामे 25 एप्रिलपासून सुरू करून मान्सूनपूर्व सर्व जलतारे व शोषखड्डे तांत्रिक बाबींसह पूर्ण करणे, केलेल्या कामांचे जिओ-टॅग फोटो अपलोड करणे,तसेच सर्व जल जीवन मिशन योजनेच्या उद्भवाशेजारी कामे करणे यावर भर देण्यात आला. तसेच,गावांतर्गत पाण्याची क्षमता जास्त असलेले हातपंप व विंधन विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभांची स्वच्छता मोहीम राबविणे,जैविक व रासायनिक तपासणी मान्सूनपूर्व करणे,गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणे आणि रिचार्ज शाफ्ट केलेल्या कामांची स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या. यावेळी उमरगा, धाराशिव,भूम, तुळजापूर,परंडा,वाशी येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व संबंधित कनिष्ठ अभियंते व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
