उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांची एसटी बसची प्रतीक्षा आता संपणार आहे. आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत केलेल्या आक्रमक मागणीची दखल घेत राज्य सरकारने तालुक्यासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांनी विधानभवनात यासंदर्भात अधिकृत ग्वाही दिली असून, यामुळे मतदारसंघातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

मतदारसंघातील अनेक ग्रामीण मार्गांवर बसेसची संख्या कमी असल्याने शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रवीण स्वामी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते. जुन्या झालेल्या बसेस आणि अपुऱ्या फेऱ्यांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने नवीन बसेसचा ताफा मिळावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश आले आहे.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी येणाऱ्या काही दिवसांतच उमरगा आणि लोहारा तालुक्यांसाठी विशेष कोट्यातून नवीन बसेस दिल्या जातील, असे आश्वासित केले आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जादा फेऱ्यांचे नियोजन करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तालुक्यातील एसटीचे जाळे अधिक सक्षम होणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

आमदार प्रवीण स्वामी यांच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल संपूर्ण तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे. विकासगंगा मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर भर देत असल्याचे यावेळी आमदारांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि सर्वसामान्य जनतेला हक्काचे आणि सुरक्षित साधन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


 
Top