तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील शेतकरी आप्पा सोपान पवार (वय 50 वर्ष) यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि.8 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी सकाळी उघडकीस आली. अपसिंगा ते ढेकरी रोडलगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास साडीच्या पटकराने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. 

मृत शेतकऱ्यांकडे 4 एक्कर कांद्याचे पीक होते. मात्र सध्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने बँक व फायनान्सचे हप्ते कसे भरायचे, या चिंतेत ते होते. त्यातच बँक व फायनान्स कंपनीकडून  होत असलेल्या तगाद्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. उत्पन्न हातात येत नसताना कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने शेतकरी अक्षरशः हातबल झाल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार चौधरी तसेच त्यांची टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर पुढील वास्तव स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणी पंचनामा करून बँक व फायनान्स कोणते आहे कर्ज किती होते ते पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अपसिंगा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतमालाला योग्य भाव, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठोस उपाययोजना कधी होणार? असा संतप्त सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

 
Top