धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक सामाजिक न्याय दिन (20 फेब्रुवारी) निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव आणि श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहमुक्त भारत आपला संकल्प अभियान व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिली. आपल्या गावात, शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये बालविवाह होत असल्यास तो त्वरित रोखावा, असे आवाहन त्यांनी केले. बालविवाहाबाबत माहिती देण्यासाठी 1098 या मोफत मदत क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पोलिसांना कळवावे,असेही त्यांनी सांगितले.
बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या मुलीला किंवा मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवणे,अयोग्य हातवारे करणे यांसारखी कृत्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना व ‘नालसा-मुलांसाठी बालस्नेही कायदेविषयक सेवा योजना, 2024’ याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे,उपप्राचार्य संतोष घासे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम,ॲड. विश्वजीत शिंदे (पॅनल विधिज्ञ) व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक एस.सी.पाटील यांनी केले,तर कार्यक्रमाच्या फलप्राप्तीचे महत्त्व अधोरेखित करत आभार प्रदर्शन के.पी.पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.