धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी 29 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमानुसार धाराशिव जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत असलेल्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका निश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील एकूण 138 मतदान केंद्रांवर 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पडावी,यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत शिस्त व गोपनीयता राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून,मतदानाच्या दिवशी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी) घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.मतदान प्रक्रियेवर कोणताही अनुचित प्रभाव पडू नये तसेच मतदानाची गोपनीयता अबाधित राहावी,या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि,नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, मतदानासाठी येताना मोबाईल फोन सोबत आणू नयेत.मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल फोन आढळून आल्यास प्रवेश नाकारला जाईल याची मतदारांनी नोंद घ्यावी.
जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व मतदारांनी निर्भयपणे,शांततेत व नियमांचे पालन करून मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून,जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदवावा,असेही प्रशासनाने केले आहे.