धाराशिव  (प्रतिनिधी)- सर्व समाजासाठी गुरु तेग बहादूर साहीबजी यांनी त्याग केला. लकीशा बंजारा व गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास अबाधित राहावा हा नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन पोहरादेवी येथील धर्मपिठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बंजारा समाज बांधवांच्या बैठकीत महंत जितेंद्र महाराज बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महंत जितेंद्र महाराज म्हणाले की, गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना माहीत झाला पाहिजे.नांदेड येथील कार्यक्रम हा जागतिकस्तरावरचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक नांदेड येथे येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,असे ते म्हणाले.

कडवकर यावेळी बोलताना म्हणाले की,नांदेड येथील कार्यक्रमाचे मोठे महत्त्व आहे.त्याकाळी गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्यासोबत अनेक समाजांचे लोक जुळले होते.त्यांचा वैभवशाली सांस्कृतिक इतिहास आहे.चांगल्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. विविध समाजाचे योगदान या कार्यक्रमासाठी असले पाहिजे. जिल्ह्यातील कोणत्या तांड्यातून व गावावरून किती लोक नांदेड येथे जाणार आहेत याची माहिती द्यावी.दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या समन्वयातून नांदेड येथील कार्यक्रमाला जाणाऱ्या नागरिकांसाठी वाहनाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती श्री.कडवकर यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला हिंद दी चादर क्षेत्रीय आयोजन समितीचे संतोष चव्हाण, ॲड.प्रवीण पवार,विलास राठोड,विद्यानंद राठोड,दिनेश चव्हाण,शिवाजी राठोड, बाळासाहेब पवार,वसंत पवार,लक्ष्मण राठोड,राहुल राठोड,विनायक राठोड, ज्ञानदेव राठोड,दामाजी राठोड, बी.बी.राठोड,नितीन पवार,नितीन राठोड, गुरुनाथ राठोड व दिनेश राठोड यांची उपस्थिती होती.

 
Top