धाराशिव (प्रतिनिधी)- विरोधकांना खोटं नाट म्हणताना अगोदर आपण स्वतः आरशात बघा मग समजेल खरं आणि खोटं कोण. बिहारप्रमाणे धाराशिवमध्ये जनता निर्णय घेईल असं बोलून तुम्ही बिहार व धाराशिवची तुलना करून इथल्या जनतेचा अपमान करु नये, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपला केलं आहे.
जाधवर म्हणाले की, शहर विकासाच्या गप्पा मारताना आपण विकास कामातील केलेली अडवणूक बाजूला पडेल असं राणा पाटील यांना वाटत असेल. 140 कोटीच्या रस्ते प्रकरणी भाजपने झारीतील शुक्राचार्य म्हणून पालकमंत्री यांच्याकडे बोट दाखविले होते. दिखाऊ आंदोलन देखील स्वतःच्या सरकार विरोधात पक्षाने करून तुमच्यातील खरेपणा दाखवून दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती देण्यासाठी आपण लावलेली शक्ती जिल्हा विसरला नाही. त्याच कारण पण अजूनपर्यंत खरेपणा मिरविणाऱ्या राणा पाटील यांनी दिलेलं नाही. विरोधातील आमदार असल्याचा मनातील राग थेट जनतेवर काढणारे तुम्ही आता त्याच जनतेच्या मतासाठी विकासाची नाटकी भाषा करतायेत हे देखील खरेपणाचा अजून एक पुरावाच म्हणावा लागेल. बिहार च्या निकालाने राणा पाटील इतके हुरळून गेले की आपण धाराशिव मध्ये राहतोय याचा त्यांना विसर पडल्याच दिसत आहे. म्हणून बिहारची व धाराशिवची तुलना तुम्ही केली आहे. याचे उत्तर जनता तुम्हाला दोन डिसेंबरच्या मतदानाद्वारे देईल असा टोला तानाजी जाधवर यांनी लगावला.