धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्यापही अतिवृष्टीचे निकष धरून पंचनामे करण्यात आलेले नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील तसेच कृषिमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. या वेळी आमदार कैलास पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्वरित नोंदवून स्थळ पंचनामे करण्यात यावेत प्रत्यक्षात 65 मिमी पेक्षा जास्त़ पाऊस होऊन देखील शासनाकडुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असुन ज्यामंडळामध्ये अतिवृष्टी झाली नाही त्या मंडळामध्ये सततच्या पावसामुळे नुकसान गृहीत धरून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी मंत्री महोदया कडे केली.
निवडणुकीपूर्वी जशाप्रकारे शेतकऱ्यांना 13500 प्रति हेक्टर प्रमाणे मदत जाहीर केली होती त्याप्रमाणे आत्ता देखील मदत तातडीने मंजूर करण्यात यावी. धाराशिव जिल्ह्यात 78 मिली पेक्षा जास्तीचा पाऊस झाला असल्याने अतिवृष्टी व सततचा पाऊस याचे निकष लावून मदत करण्यात यावी.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळापैकी 30 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाले असून इतर मंडळांमध्ये सततचा पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन उडीद मूग तूर आधी नगदी पिकांचे नुकसान झाले आहे तसेच जिल्ह्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नद्या काठच्या जमिनी खरवडून शेतकऱ्यांच्या शेतामधील माती पुरामुळे वाहून गेली आहे. या पुरांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली असून शेतकऱ्यांचे जीविताचे साधन पुरामुळे नष्ट झाले आहे.
यासंदर्भामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांना तातडीने मदत करणे बाबत प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केली आहे.