धाराशिव (प्रतिनिधी)-  पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी 75 हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी) आणि इतर घरकुल योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस डी.आर.डी.ए.चे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन श्री. त्र्यंबक ढेंगळे पाटील तसेच सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 12,809 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 60 हजार रूपये अनुदान देऊन घरकुले मंजूर करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात 2024-25 पासून लाभार्थ्यांना 2 लाख 10 हजारापर्यंत वाढीव अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 70 हजार 441 आणि शहरी भागातील 5 हजार घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना ‌‘पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना' अंतर्गत मिळणारे अनुदान देखील 50 हजारावरून वाढवून 1 लाख रूपये करण्यात आले आहे. 


 
Top