धाराशिव (प्रतिनिधी)- निवडणूक काळात फसव्या घोषणांची खैरात करत सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. अश्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्याना आता जनतेने दारात उभा करु नये असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले. 

सरकारच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्त्वात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता.12) धाराशिव शहरातील शिंगोली विश्रामगृहासमोर जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  तब्बल दोन तास केलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सोलापूर आणि धुळे मार्गावर जाणाऱ्या माल वाहतुकीसह प्रवाशी वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागली होती.

शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर शेतीमालाला हमीभाव, बी-बियाणांवर अनुदान तसेच सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी चक्क ट्रॅक्टर, पेरणी यंत्र घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला. आंदोलनात भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

आंदोलनात सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर,भारत इंगळे,महिला आघाडी शामल वडणे, मनीषा वाघमारे,जिल्हा संघटक दीपक जवळगे, दिलीप पाटील,शिवसेना सचिव प्रवीण कोकाटे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर,उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,प्रदीप मेटे,जितेंद्र कानडे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, जग्गनाथ गवळी, सचिन काळे,अमोल बिराजदार शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राहुल खपले,विश्वजीत जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे,मनोहर धोंगडे, दिनेश बंडगर,संग्राम देशमुख, शाम जाधव, राजेश्वर पाटील संजय खडके, नगरसेवक राजाभाऊ पवार,राणा बनसोडे, तुषार निंबाळकर सिद्धेश्वर कोळी, गणेश खोचरे,पंकज पाटील, शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

 
Top