धाराशिव (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात पवनचक्की कंपन्यांची बाजू घेवून शेतकऱ्यांवर अमाणूस लाठी हल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा. अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पवनचक्की कंपनीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. तांदुळवाडी परिसरात गणेश शेरकर या शेतकऱ्याच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे दोन टॉवर गेले आहेत. एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला तेवढाच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा. अशी माफक अपेक्षा शेरकर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी कंपनीचे काम शनिवार दि. 21 जून रोजी थांबविले होते. पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मावेजा देण्याच्याऐवजी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुंडगिरी करण्यास सुरूवात केली. यावेळी भाजप नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी शेतकऱ्यांसह राजू कवडे यांच्यावर अमाणूस लाठी मार केला. विशेष म्हणजे वाशी तालुक्यातील शेतकरी योग्य मावेजा मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यापासून संषर्घ करीत आहेत. सदर घटना आमदार कैलास पाटील यांना माहित होताच आमदार पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्या पोलिसांची निजाम राजवटीतील रजाकार यांच्या पोलिसांबरोबर तुलना केली आहे. रजाकार यांचे पोलिस पण काही दोष नसताना जनतेला त्रास देत होते. त्याच पध्दतीने काही पोलिस अधिकारी व काही पोलिस विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. पवनचक्की कंपनीच्या सल्ल्यानुसार खाकी वर्दीतील गुंडांनी शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून त्याच ऊसाने शेतकऱ्यांवर लाठी मार केला. या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


 
Top