धाराशिव (प्रतिनिधी)-  तालुक्यातील वडगाव (सि.) येथील एमआयडीसीच्य भूसंपादनाचा पेच सोडवण्यासाठी दि. 6 जून रोजी घेतलेल्या बैठकीत शेतकरी आक्रमक झाले. केवळ दरीचे क्षेत्रफळ वगळण्याऐवजी सर्वच क्षेत्र शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे अधिकाऱ्यांकडून पत्र न मिळाल्याने शेतकरी पुन्हा संतप्त झाले असून, आता 22 जूनला विष प्राशन आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल पत्रही स्विकारले नाही.

वडगाव येथील 356 एकर जमीन एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आली आहे. 2012 ला यासाठी प्रक्रिया झाली. मात्र 57.14 हेक्टर क्षेत्राचा मावेजा शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. गेल्या 14 वर्षापासून मावेजासाठी प्रयत्न करणारे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यामुळे त्यांनी सोमवारी विष प्राशन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. हादरलेल्या प्रशासनाने लवकरच या संदर्भातील पेच सोडवण्यासाठी बैठकीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. एमआयडीसीचे अधिकारी 57.14 हेक्टर क्षेत्रापैकी 18.58 हेक्टर क्षेत्र वगळणार असल्याचे सांगत होते. केवळ इतकेच क्षेत्र न वगळता संपूर्ण 57.14 हेक्टर क्षेत्र वगळावे, अशी शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे अधिकाऱ्यांनीही माघार घेतली वनंतर कोणत्याही मुद्याबाबत बैठकीत अधिक चर्चा केली नाही. शेतकऱ्यांनी या संदर्भात लेखी देण्याची मागणी केली. मोहन पाटील, अण्णा पाटील, दत्ता थोरात, पारूबाई चव्हाण यांच्यासह सर्वांनीच या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. बैठकी सांगितल्याप्रमाणे पत्र दिले नसल्याने शेतकरी नाराज झाले असून, पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


 
Top