धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करून सामाजिक समतेचा आदर्श ठेवावा,“असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‌‘सामाजिक न्याय दिन' म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला.जिल्हास्तर,तालुका स्तर आणि ग्रामपातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मैनाक घोष होते.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सचिन कवळे यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक भैरवनाथ कानडे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सन 2023-24 मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  वाय.एस.चव्हाण यांनी केले. 

 
Top