धाराशिव (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी साजरा केला जाणारा सामाजिक न्याय दिन यंदा धाराशिव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरावर भव्य समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व शारीरिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. सचिव डॉ.हर्षदीप कांबळे,आयुक्त डॉ.ओमप्रकाश बकोरिया व लातूर विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त डॉ.श्रीमती छाया कुलाल यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभाग सातत्याने कार्यरत आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात 26 जून 2025 रोजी समता दिंडी काढून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
या दिंडीचे उद्घाटन सकाळी 8 वाजता श्री.सय्यद असरार,गट शिक्षण अधिकारी,पंचायत समिती,धाराशिव व श्रीमती हाके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,श्री.सचिन कवळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.या दिंडीमध्ये समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
समता दिंडीमध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि जवळपास 2500 विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.दिंडीची सुरुवात मल्टीपर्पज हायस्कूल,जिल्हा परिषद धाराशिव येथून करण्यात आली. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. दिंडीचा समारोप यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद येथे झाला. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी समता, बंधुता आणि सामाजिक समतेचे संदेश देणारे फलक,घोषवाक्य आणि सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले होते. ही समता दिंडी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेबाबत जागृती निर्माण करणारी ठरली असून, सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा हा उपक्रम विशेष प्रेरणादायी ठरल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.