धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 40 टक्क्यांनी वाढ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या “तुळजाई कृषी महसूल-वाढ अभियान अर्थात तारा” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस आता गती मिळताना दिसत आहे. उस्मानाबादी शेळीचा या महत्वपूर्ण प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ग्रँड थॉरटन इंटरनॅशनल या जागतिक ख्याती असलेल्या संस्थेची अधिकृत सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार 25 जून रोजी मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

तारा प्रकल्पाचे सविस्तर अहवाल लेखन अर्थात डीपीआर कृषी आयुक्त आणि ग्रँड थॉरटन इंटरनॅशनल व 'मित्र' संस्थेतील मान्यवर तज्ञांच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे. हा प्रकल्प केवळ कृषी नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. बुधवार 25 जून रोजी मुंबईत 'मित्र'च्या कार्यालयात 'मित्र'चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत धाराशिव जिल्ह्याची ओळख असलेल्या उस्मानाबादी शेळीच्या विकासासाठी स्वतंत्र शेळी पालनासाठी आवश्यक असलेले सर्व पूरक घटकांची उत्पादन पूर्व साखळी व उत्पादनोत्तर मूल्यवर्धन प्रक्रिया,विक्री व्यवस्थापन साखळी तयार करण्याचे ठरले आहे. यासाठी सह्याद्री ऍग्रोचे अध्यक्ष विलास शिंदे यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे पुढील आठवडाभरात तसा प्रस्ताव सादर करणार आहेत. या प्रकल्पात कृषिआधारित उपक्रम व महिलांसाठी स्वतंत्र उद्योग, एक लाख शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक व बाजारपेठेची जोड, हमी दराने थेट खरेदी, ब्लॉकचेनचा वापर,  तंत्रज्ञानाचा वापर, शेती प्रक्रिया युनिट्स, कोल्ड स्टोरेज, सौर ऊर्जा प्रकल्प आदींचा अंतर्भाव असणार आहे. तुळजापूर व सोलापूर दरम्यान माळुंब्रा येथे 1000 एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 24 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. ग्रँड थॉरटन इंटरनॅशनलया संस्थेच्या सल्ल्याने प्रकल्पाची व्याप्ती जागतिक दर्जावर नेण्यात येणार आहे. शेतमालाच्या भावाची सुरक्षा, प्रक्रिया, ब्रँडिंग, निर्यात आदी दृष्टीकोनातून हा प्रकल्प ‌‘कृषी-क्रांती'चे आगळेवेगळे उदाहरण ठरणार आहे.

 
Top