धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्रात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवारत अंशकालीन महिला परिचर यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या सोडविण्यासाठी तात्काळ चर्चेची बैठक आयोजित करून किमान वेतन व प्रलंबित प्रश्न सोडवावेत. मागण्या मान्य न केल्यास दि.1 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे दि.27 जून रोजी एका निवेदनाद्वारे दिला आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद  करण्यात आले आहे की, महिला परिचर विखुरलेल्या असंघटित दुर्गम भागात काम करणाऱ्या आदिवासी, मागास, निराधार, विधवा व परित्यक्ता या स्तरातील महिला काम करीत आहेत. यांच्यावर दबाव टाकून पूर्णवेळ काम केले जात आहे. मानधन मात्र महिन्याला 3 हजार आणि दिवसाला 100 रुपये दिले जात असल्याची अतिशय गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे मानधन निधी महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस येत असून काही जिल्ह्यांमध्ये वेळेवर मानधन होत नसल्याचा प्रकार काही जिल्ह्यात घडत आहे. त्यामुळे महिला परिचर यांना किमान 21 हजार रुपये वेतन देण्यात यावे. तर अंशकालीन नावात बद्दल करण्यात यावा. दरवर्षी गणवेष व भाऊबीज देण्यात यावी. तसेच दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन देण्यात यावे. तर बायोमेट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये. तसेच आयुर्वेदिक ऍलोपॅथिक डिस्पेन्सरीमध्ये व्यतिरिक्त साफ सफाई काम करुन घेतल्यास मोबदला देण्यात यावा आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी हस्तक्षेप करुन न्यायाचे आदेश व्हावेत.

अन्यथा दि.1 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिषद

महासंघाच्या जिल्हाध्यक्ष अनिता क्षीरसागर, सरचिटणीस सुनिता क्षिरसागर, कार्याध्यक्ष कांताबाई खांडेकर, कोषाध्यक्ष रेणुका आव्हाड, ज्योती कांबळे, रसिका वाघमारे, वनमाला गायकवाड, सुरेखा गांधले, ज्योती भुसारे, लक्ष्मी राठोड, रागिनी कापसे, रमा शरणागत, वैशाली धले, स्वाती खंडागळे, सोनाली ताटे, रंजना डोईफोडे, रंभाबाई शिनगारे, अशा क्षीरसागर, रेश्मा लोंढे, स्नेहाराणी कसबे, अश्विनी मगर, अपर्णा वाघमारे, रागिनी माळी, सुवर्णा देडे, शकीला शेख, रंजना धोंगडे, जनाबाई गिरी, कविता कांबळे उषा वडणे, वंदना पांचाळ, रोहिणी पोतदार, इंदुबाई कांबळे, प्रभावत्ती कांबळे, नंदिनी जाधव, इंदुबाई सुतार, सज्जु मुलानी, जया निंगुळे, आशा भोरे, ज्योती ओव्हाळ, लक्ष्मी नन्नवरे, सुकमार वाकळे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top