धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आळणी येथे दिनांक 16 जून 2025  रोजी नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत हे पारंपरिक पद्धतीने, ढोल-ताशांच्या गजरात आणि सजवलेल्या बैलगाडीतून गावातून लेझीम ढोल आणि बँड पथकाच्या मधुर संगीताने  फेरी काढून करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची  सुरुवात  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा चे पूजन प्रमुख पाहुणे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद धाराशिव चे शिक्षण अधिकारी श्री अशोक पाटील साहेब उपशिक्षणाधिकारी श्री दत्तप्रसाद जंगम साहेब वरिष्ठ विस्तार अधिकारी श्री मल्हारी माने साहेब,गावचे सरपंच मा. श्री. प्रमोद काका वीर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संजीवनी पौळ, उपाध्यक्षा सौ. अफसाना शेख, सदस्य श्री. निलेश देशमुख, सौ. अनिता पौळ, येडशी-बीटचे विस्तार अधिकारी श्री. प्रकाश पारवे साहेब, तसेच शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांच्या औक्षणाने करण्यात आली. त्यानंतर गोड पदार्थ जिलेबी गोड भात खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. नव्या शैक्षणिक जीवनात  पहिले पाऊल ठेवणाऱ्या मुलांचा सन्मान म्हणून “पहिले पाऊल” उपक्रमही राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना गावच्या सरपंचांसह शाळा समितीच्या सदस्यांच्या हस्ते प्रवेशपत्र, नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच फुल देऊन प्रत्येकाचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील 270 विद्यार्थ्यांना सरपंच श्री प्रमोद काका वीर यांच्यावतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सत्यशीला म्हेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मंजुषा नरवटे यांनी केले. शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या सहभागातून झालेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला. शिक्षण क्षेत्रात अशा उपक्रमांद्वारे शाळा व समाज यांच्यातील नातं अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्य वरांनी केले.


 
Top