तुळजापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यात गायरान व वन विभागाच्या जमिनीवर बंजारा समाजाचे 164 तांडे आहेत. वर्षानुवर्ष हा समाज त्या ठिकाणी वस्त्या करून राहत आहे. मात्र राहत्या घरांची जागा त्यांच्या नावावर अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या घरकुलाचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. घरकुल पासून हा समाज कोसो दूर असल्यामुळे त्यांना घरकुल मिळावे यासाठी राहत्या घराचे सातबारे यांच्या नावावर करावेत आणि त्या माध्यमातून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा. अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी दि.20 जून रोजी केली.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, बंजारा समाजाला घरकुलाचा लाभ मिळत नसल्यामुळे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची दि.25 जानेवारी रोजी भेट घेऊन निवेदनाद्वारे घरकुलाचा लाभ देण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडविण्याची मागणी केली. त्याबरोबरच दि.13 मे रोजी मुंबई मंत्रालयात पालकमंत्री सरनाईक यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. पालकमंत्री सरनाईक यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांना कारवाई करण्यासंदर्भात बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि.19 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प विकास अधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत बंजारा समाजातील राहत असलेल्या नागरी वस्तीच्या जागा त्यांच्या नावावर करण्यासह गायरान, गावठाण व वन विभागाच्या जागेत वस्ती करुन राहणाऱ्या बंजारा समाजातील नागरिकांच्या घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. तर राहत्या घराची जागा नावावर करण्यासाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवून देणार असल्याचे पुजार यांनी सांगितले. त्या जागा त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे ते वंचित राहतात. त्यासाठी शासनाने जिल्हास्तरीय समिती नेमून गाव तांडा वस्तीनिहाय सर्वे करून या समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ही पवार यांनी केली. तसेच ज्या बंजारा समाजाला स्वतःची जागा नाही अशांना घरकुलासाठी पंडित दीनदयाळ जागा खरेदी योजने अंतर्गत एक लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन पुजार यांनी दिले असल्याचे पवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे

संपूर्ण प्रक्रियेमध्ये संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत आहे. बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी हा मोठा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


अंगणवाडी कार्यकर्तीच्या धर्तीवर ऊसतोड कामगारांना मदत करावी

राज्यात ऊसतोड कामगारांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. हे कुटुंब गाव सोडून कोसो दूर ऊस तोडीसाठी जातात. त्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण असते. रात्रंदिवस जोखमीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांचा अपघात झाल्यास त्यांच्या वारसास अपघात विमा सुरक्षा अंतर्गत पाच लाख रुपये देण्याची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. तो अपघात देखील फक्त ऊसतोड सुरू असल्याच्या कालावधीत धरण्यात आलेला आहे. त्याऐवजी अंगणवाडी कार्यकर्त्यांना अपघात विमा अंतर्गत दहा लाख रुपयांचे संरक्षण दिले आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या धर्तीवरच ऊसतोड कामगारांना विमा सुरक्षा देण्यात यावी मंत्री संजय शिरसाठ यांनी शासन निर्णयामध्ये अंशतः बदल करावा अशी मागणी पवार यांनी केली.

 
Top