भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यातील आरसोली या गावात जाणाऱ्या रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून बार्शी कडे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे या रस्त्याने वाहनांची वर्दळ देखील वाढली होती. मात्र मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून मोटार सायकल वरून प्रवास करताना देखील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे कायम रस्ता दुरस्तीची मागणी करण्यात आली होती. परंतु भूम - आरसोली रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र पक्क्या रस्त्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते तरुण ठाम आहेत.

त्यामुळे येथील तरुण नितीन श्रीधर गुंजाळ यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्व तरुणांच्या माध्यमांतून दिनांक 1 मे 2025 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी या रस्त्यासांदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सामूहिक आत्मदहन आंदोलन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय कार्यकारी अभियंता, पोलीस निरीक्षक या सर्व अधिकाऱ्यांनी निधी अभावी हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले व हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यास प्रशासनाला यश आले. मागील आठवड्यात या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर खराब झालेला काही भाग प्रशासनाने दुरुस्त केला आहे. मात्र या तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केलेल्या कामा बद्दल येथील रहिवाशी आंदोलनकर्ते नितीन गुंजाळ यांच्याशी विचारणा केली असता, हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे असून एवढा पावसाळा होईपर्यंत टिकणारे आहे. त्यामुळे पुढील काळात देखील या रस्त्याची अवस्था जैसे थे होणार असून आम्ही या डागडुजीच्या कामावर असमाधानी असून आम्हाला जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे येत्या तीन ते चार महिन्यांत भूम ते आरसोली हा रस्ता कमानी पुला सह चांगल्या दर्जाचा नव्याने तयार करून मिळावा. या मागणीवर आम्ही सर्व ग्रामस्थ ठाम आहोत असे त्यांनी सांगितले. 


चांगला रस्ता हे गावाचे वैभव समजले जाते. विशेष म्हणजे हे गाव अधिकारी वर्गाचे गाव आहे. त्यामुळे तालुक्याला जाण्यासाठी चांगला रस्ता असेल तर गावाचा विकास जलदगतीने होतो.राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने लवकरात लवकर आरसोली रस्ता चांगल्या दर्जाचा व नवीन तयार करून ग्रामस्थांना सहकार्य करावे.

- प्रशांत मुंडेकर (माजी सरपंच आरसोली)

 
Top