धाराशिव (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी च्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवानिमित्त यात्रा कालावधीत दिनांक 2 जुलै ते 11 जुलै या कालावधीत एसटीच्या धाराशिव विभागाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी 165 ज्यादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती धाराशिव एसटीचे विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली आहे. 

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धाराशिव एसटी विभागाच्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी आषाढी यात्रा महोत्सवानिमित्त ही ज्यादा बस गाडयांची सोय करण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्यातील सहा बस आगारांमधील  या 165 जादा गाड्या प्रवाशाची वाहतूक करणार आहेत. त्यामध्ये धाराशिव आगार 30, उमरगा 26,  भूम 26, तुळजापूर 40, कळंब 26, व परंडा 17 अशा एकूण 165 जादा गाड्या या यात्रा महोत्सवासाठी प्रवाशांची वाहतूक करणार आहेत. 


50 जणांसाठी विशेष सोय 

या यात्रा कालावधीमध्ये श्री विठूरायाच्या दर्शनासाठी 50 प्रवाशांनी एकत्रित बुकिंग केल्यास त्यांना विशेष जादा गाडीची सोय देखील एसटी विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेळेवर व सुरक्षित प्रवासासाठी जिल्ह्यातील सर्व प्रवाशांनी एसटीचाच पर्याय निवडावा व एसटीनेच प्रवास करावा. असे आवाहन धाराशिव एसटी विभागाचे विभाग नियंत्रक भालेराव यांनी केले आहे.


धाराशिव विभागात 2011 पासून भरती नाही 

धाराशिव जिल्ह्यात मागील 14 वर्षाच्या काळात एसटीच्या प्रवासी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. नवीन बस स्थानक देखील झाले आहेत. परंतु सन 2011 नंतर एसटी विभागातील नवीन चालक व वाहक यासह ईतर पदांची भरती झाली नाही.  या कालावधीत अनेक कर्मचारी निवृत्त देखील झाले आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत धाराशिव विभागामध्ये 185 चालकांच्या जागा रिक्त असून, 119 वाहकाच्या जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात एसटी महामंडळात भरती झाली आहे. जिल्ह्यात कमी मनुष्यबळावर मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना दैनंदिन सुरक्षित वाहतूक सुविधा पुरविणे एसटी विभागास जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने ही पदे लवकर भरणे गरजेचे आहे.

विनोद भालेराव

विभाग नियंत्रक,एसटी विभा धाराशिव


 
Top