धाराशिव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थळांवर होणार्या हल्ल्यांच्या घटनामध्ये वाढ होत आहे. बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावात मशिदीमध्ये जिलेटीनचा स्फोट घडवून आणल्याच्या घटनेचा निषेध करत महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना विशेष संरक्षण द्यावे अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी (दि.1) मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले की, गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला लक्ष्य करुन तसेच समाजाप्रति द्वेषाचे वक्तव्य करुन समाजात विष कालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. ही बाब निंदणीय असून त्याचा मुस्लिम समाज निषेध करत आहे.
त्याचीच परिणिती म्हणून काही जातीयवादी व्यक्तीनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला. तसेच जालना येथे दर्ग्याची तोडफोड, दर्ग्यावर विशिष्ट झेंडे लावणे, समाजाबद्दल अपशब्द वापरणे असे प्रकार घडत आहेत. या घटना निषेधार्ह असून मुस्लिम समाजाच्या सहनशीलतेच्या पलिकडची बाब आहे.
ज्याप्रकारे नागपूर येथील दंगलखोरांवर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करुन त्यांची घरे बुलडोजरने पाडली, तशीच कारवाई बीड व जालना जिल्ह्यातील समाजकंटकांवर करण्यात यावी, समाजामध्ये विष पेरण्याचे काम करणार्यांवर देखील कठोर कारवाई करावी, जेणेकरुन महाराष्ट्रात जातीय शांतता व सलोखा निर्माण राहील, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मसूद शेख, अॅड. परवेज काझी, कादरखान पठाण, वाजीद पठाण, आयाज शेख, एजाज काझी, अॅड. फेरोज शेख, तौफिक पठाण, अन्वर शेख, खलील पठाण, इरशादअली सय्यद, अफरोज पीरजादे, इस्माईल काझी, बाबा मुजावर, रउल्ला शेख, इम्रान खान, अॅड. जावेद काझी, साबेर सय्यद, अतिक शेख, तौफिक शेख, अल्ताफ शेख, हसीब काझी, बिलाल तांबोळी, महेमूद मुजावर, खलील शेख, इब्राहीम शेख, इस्माईल शेख व इतर समाजबांधवांची स्वाक्षरी आहे.