उमरगा (प्रतिनिधी)-  शिक्षण संस्था या सुसंस्कारीत पिढया घडविणारे मंदिर आहेत. शिक्षण संस्था मध्ये चारित्र्य संपन्न व गुणवंत शिक्षक मिळणे हे त्या - त्या शिक्षण संस्थेचे भाग्य आहे. असे सांगून श्रमजीवी शिक्षण संस्थेला उत्कृष्ट शिक्षक व प्राध्यापक वर्ग मिळाल्या मुळेच या शैक्षणिक संस्थेचा शैक्षणिक विकास झाला आहे. इतर क्षेत्रांच्या तुलनेत शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांनी आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग सुसंस्कृत व उत्कृष्ट समाज निर्मिती साठी करावा. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी केले.

येथील आदर्श महाविद्यालयातील प्रा.डॉ. सतीश अलगुडे, प्रा. शौकत पटेल, प्रा.डॉ. भीमाशंकर खरोसे यांच्या सेवापूर्ती सोहळ्या निमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री बसवराज पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील होते. संचालक मल्लीनाथ दंडगे, कृऊबाचे सभापती बसवराज कस्तुरे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, ॲड. गोविंद गायकवाड, ॲड. व्ही. एस. आळंगे, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, ॲड. सुभाष राजोळे, गोविंद सुर्यवंशी, अनिल सगर, ॲड. संजय बिराजदार, बाबा आवटी, महेश माशाळकर, ॲड. एस.पी. ईनामदार आदि सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांचे अध्यक्षीय तर प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांचे ही भाषण झाले. प्रा.डॉ. शौकत पटेल, प्रा. डॉ. भीमाशंकर खरोसे, प्रा. सतीश अलगुडे यांनी सेवापूर्ती सन्मानाला उत्तर दिले. प्रास्ताविक प्रा.डॉ. बालाजी मोरे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी केले. अंजूम पटेल, प्रतिक्षा अलगुडे- मुरमे, विजयादेवी खरोसे यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रा.डॉ. राम सोलंकर यांनी मानले.

 
Top