धाराशिव (ंप्रतिनिधी)- येरमाळा येथे 12 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरात चैत्र पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक येणार आहे. मोठ्या संख्येने भाविक या यात्रेला येणार असल्यामुळे यंत्रणांनी यात्रेच्या काळात आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी यात्रा नियोजनाचा विविध यंत्रणांकडून मंदिरातील सभागृहात आढावा घेताना पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक अशफत आमना, कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार व तहसीलदार हेमंत ढोकले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुजार म्हणाले, यात्रेदरम्यान काम करणाऱ्या यंत्रणांनी आपआपली जबाबदारी वेळीच पार पाडावी.वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने काम करावे. यात्रेदरम्यान योग्य समन्वयासाठी देवस्थान परिसरात यंत्रणांची एक कंट्रोल रूम सज्ज ठेवावी.या कंट्रोल रूममध्ये मंदिर ट्रस्ट व विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असावा.त्यामुळे यात्रेदरम्यान येणाऱ्या अडीअडचणी व समस्या वेळीच सोडवता येतील.यात्रेदरम्यान नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश संबंधित विभागाने काढावे.भाविकांशी यात्रेदरम्यान सौजन्याने वागावे.यात्रा उन्हाळ्याच्या दिवसात असल्यामुळे उष्माघाताची शक्यता लक्षात घेता,आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात.यात्रेदरम्यान भाविकांच्या वस्तू,मोबाईल व लहान मुले हरवितात,अशावेळी लाऊड स्पीकरवरून उद्घोषणा करण्याचे नियोजन करण्यात यावे,असे श्री.पूजार यांनी यावेळी सांगितले.
डॉ घोष, पोलीस अधीक्षक जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. मंदिर ट्रस्टच्या वतीने यात्रेच्या तयारीची माहिती ट्रस्टचे संतोष आगलावे यांनी दिली. उपसरपंच गणेश बाबा यांनी यात्रेसाठी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. संचालन मंदिर ट्रस्टचे समाधान बेदरे यांनी केले. प्रास्ताविक तहसीलदार ढोकले यांनी तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी मानले.