धाराशिव,(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाची सुधारणा व विसर्जन विहिर ते एचडीएफसी बँकेपर्यंतचा उर्वरीत काँक्रीट रस्ता तत्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी समता गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मागणीची दखल न घेतल्यास 1 एप्रिलपासून विसर्जन विहिरीजवळ आमरण उपोषण करण्याचा इशाराही समता गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन नाना घाटगे यांनी दिला होता. अखेर नगर परिषदेने मंगळवारी (दि.1) सदरील रस्त्याच्या कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 15 दिवसांत कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यात येईल असे पत्राद्वारे कळविले आहे.
दोन्ही कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली होती. अद्यापपर्यंत सदरची कामे चालु झालेली नाहीत. दोन्ही कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून प्रत्यक्षात दोन्ही ठेकेदारांना कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र दोन्ही कामे अर्धवट केलेली आहेत. त्यामुळे समता नगरवासीयांना खड्ड्यामुळे व धुळीमुळे श्वसनाचा त्रास होवून भयंकर आजाराला समोरे जावे लागत आहे. दोन्ही रस्ते रहदारीचे असल्याने हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी संबंधीत ठेकेदारास सदरचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश देऊन काम पूर्ण करून घ्यावे अन्यथा समता नगरवासीयांच्या वतीने रखडलेल्या रस्त्यावर विसर्जन विहिरीजवळ 01 एप्रिलपासून आमरण उपोषणास करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेऊन नगर परिषदेने पंधरा दिवसांत हे काम सुरु करण्यात येईल असे पत्र दिले आहे.
यावेळी समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब घाटगे, सचिव पंकज पडवळ, संचालक रामचंद्र जोशी, विक्रम इंगळे, महेश काटे, मन्सूर काझी, बंटी कादरी, हरिदास लोमटे व इतर पदाधिकारी तसेच नगर परिषदेचे अभियंता श्री. द्रुकर उपस्थित होते.