धाराशिव  (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज धाराशिव येथून 800 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्हयातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली.समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी.जी.अरवत, भाजपाचे नितीन काळे, भारतीय रेल्वेचे अधिकारी गुरुराज सोना यांनी धाराशिव रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंना निरोप देऊन हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला मार्गस्थ केले.

800 ज्येष्ठ नागरिक 60 वर्षाच्या पुढील आहेत.त्यांच्यासोबत त्यांची काळजी घेण्यासाठी 20 अधिकारी व कर्मचारी प्रवासी आहेत.5 एप्रिल 2025 ते 9 एप्रिल 2025 असा हा प्रवास असणार आहे. आज ' जय श्रीराम जय जय श्रीराम ' च्या जयघोषात 800 ज्येष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले. तीर्थ दर्शन योजनेसाठी 12 हजारावर अर्ज आले असून पहिल्या टप्यात आज 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येकडे रवाना झाले. या नागरिकांना ही यात्रा निश्चितपणे आनंद देईल. भगव्या पताका, फेटे, टोप्या, उपरणे परिधान केलेल्या प्रवाशांचे फुलांची उधळण व झेंडूच्या फुलांचे हार घालून रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. 


सोबत वैद्यकीय सुविधा

अयोध्येला जाणारी विशेष रेल्वे तुळशी माळा आणि फुगे बांधून सजविण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर आगमन होताच केलेले स्वागत पाहून ज्येष्ठ नागरिक भारावून गेले.अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच अयोध्येला जात असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. रेल्वेत वैद्यकीय सुविधांची उपलब्धता तसेच  तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी औषध उपलब्ध करून दिल्या आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 
Top