परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याने नागरिकांची झोप उडविली होती. तसेच अनेक गावात धुमाकूळ घालून 20 ते 25 जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर तालुक्यातील कपिलापूरी येथे वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला आहे.
तालुक्यातील कपिलापूरी गावत बिबट्याने मागील दोन दिवसांपासून दहशत निर्माण केली होती. दि.18 मार्च रोजी कपिलापुरी येथील दत्तू मसगुडे यांच्या शेळीवर भरदिवसा हल्ला केला होता.त्याच रात्री 12.30 च्या सुमारास वर्धमान जैन यांच्या म्हशीच्या दोन रेड्यांवर बिबट्याने हल्ला चढवला.या घटनांमुळे कपिलापुरीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बिबट्या कपिलापूरीत असल्याची खबर ग्रामस्थांनी वनविभागाला दिली असता तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या टीमने कपिलापूरी येथे बिबट्या पकडण्यासाठी तात्काळ मोहिम हाती घेतली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, दि.19 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्याचे गज तोडून आत ठेवलेला बोकड घेऊन पसार झाला. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी पिंजरा दुरुस्त करून परत पिंजरा लावण्यात आला असता बिबट्या अखेर पिंजऱ्यात दि.20 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात कैद झाला.
बिबट्या पिंजऱ्यात पकडला गेल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. बिबट्याला पकडल्याची बातमी गावात वाऱ्या सारखी पसरली असता बिबट्याला पाहण्यासाठी ग्रास्थांनी मोठ्या संख्येने कपिलापुरी येथे गर्दी केली. बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याचे पाहून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडत वनविभागाचे अधिकारी बनसोडे सह कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी घटनास्थळी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, शहर प्रमुख रईस मुजावरसह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. वन विभागाने बिबट्या पकडल्यानंतर बिबट्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्याला प्राणी जंगलात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही प्रक्रिया सुरू केली आहे.