धाराशिव (प्रतिनिधी )- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे गुंठेवारीचे बरेच प्रस्ताव दाखल करावयाचे शिल्लक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डे) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यासमोर आमरण उपोषण करण्यात असल्याचा इशारा जिल्हा संपर्क प्रमुख राज धज यांनी सोमवार 17 मार्च रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्हायातील ग्रामीण भागात राहत असलेल्या नागरिकांच्या जागेचे ले आऊट अंतिम नसल्यमुळे गरीब, वंचित आणि शोषित जनता यांना खरेदी खत करण्यास, विकण्यास आणि बांधकाम परवाना घेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने धावपळ करावी लागत आहे.
प्लॉट धारकांना मुलीचे लग्न,शिक्षण आणि दवाखान्यासाठी स्वतःचे घर किंवा प्लॉटची गुंठेवारी नसल्यामुळे विक्री करता येत नाही. तसेच बांधकाम परवानाही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक खाजगी सावकाराकडे आपला जागा किंवा घर बॉन्डवर लिहून देत आहेत. तर सावकारांच्या व्याजाचा दर जास्त असल्याने कुटुंब कर्जबाजारी होत आहेत. तसेच ले आऊट फायनल नसल्यामुळे आणि बांधकाम परवाना नसल्यामुळे राष्ट्रीय कृत बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे गरीब नागरिक सावकाराच्या गळाला अडकत आहेत. याचा फायदा घेऊन सावकारकी बळावली जात आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील गुंठेवारीस मुदत वाढ द्यावी. मुदतवाढ न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डे) च्यावतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख राज धज, अनिल वाघमारे, कौतुक माने, अजय माने,रोहित राठोड, वैभव राठोड आदींच्या सह्या आहेत.