धाराशिव (प्रतिनिधी)- महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये विविध सेवा मूल्य रुजावीत म्हणून दरवर्षी महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशीव यांचे एक आठवड्यासाठी आयोजित केलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न झाले. 

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन डॉ.विक्रमसिंह माने यांचे हस्ते व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिवचे प्रा. डॉ. गणेश ताठे यांचे अध्यक्षतेखाली, प्रा. डॉ. शितल उगले, प्रा. डॉ. बनसोडे ,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद तांबारे ,विभागप्रमुख  डॉ.उषा वडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . याप्रसंगी प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने यांनी राष्ट्र निर्माण व व्यक्तीमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विषद करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. 

या शिबीरांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशीव यांच्या सहकार्याने अवयवदान व मौखिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांची मौखिक व थायरॉईड तपासणी करण्यात आली. 

त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांची पर्यावरण अभ्यास सहल व हातलाई मंदिर परिसर स्वच्छता आयोजित करुन विद्यार्थ्यांना पर्यावरण समतोल व परिसर स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये कविता वाचन, कथाकथन विद्यार्थी, स्टाफ यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.  त्या नंतर विद्यार्थ्यांनी मेडसिंगा येथिल भैरवनाथ मंदिर परिसरात श्रमदानातून वृक्षारोपण केले. यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थी व स्टाफ यांचे स्वागत करुन आभार मानले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भेट देऊन तेथिल लहान मुलांसोबत संवाद साधून त्यांना बदलत्या काळानुसार शैक्षणिक गरज याविषयी जनजागृती केली. अशाप्रकारे विवीध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व अवयवदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.  

शिबीर यशस्वी करण्यासाठी  प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.  मनोज जोशी, प्रा. दयानंद मुंढे, प्रा.वर्षा पाटील, प्रा. आरती शिंदे, सतीश नेपते, रामेश्वर मुंढे, प्रद्युम्न वाघमोडे, मंगेश धावारे यांनी नियोजन व परिश्रम घेतले.

 
Top